समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा – प्रतापराव जाधव
पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर
समाजात घडणाऱ्या घटना व प्रश्नांवर सत्य आणि निःपक्षपाती दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी केले. पत्रकार हा समाज आणि शासन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असून शासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, समाजाला जागृत करणे आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे ही जबाबदारी पत्रकारांनी सातत्याने पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी वाशिम येथील वैकुंठधामवासी मातोश्री सौ. स्नेहलता पुनमचंद सोमाणी परिसर, वाटाणे लॉन येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, पुरस्कार वितरण व पदाधिकारी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. दिनकरराव वाटाणे होते. विशेष उपस्थिती म्हणून भागवताचार्य प.पू. रमाकांत व्यास, प.पू. गजानंद माऊली, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर व मातोश्री स्नेहलता सोमाणी यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना ‘महाराष्ट्र भूषण’ सन्मान देण्यात आला. भागवताचार्य डॉ. रमाकांत व्यास यांना ‘संत सेवाश्री’, दिनकरराव वाटाणे यांना ‘वारकरी सेवा’, डॉ. हेमराज लाहोटी, डॉ. हरीश बाहेती, डॉ. सरोज बाहेती यांना ‘विदर्भ भूषण’, श्रीमती शिलाताई राठी व ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच विविध समाजसेवक, उद्योजक, पत्रकार व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक व ‘विश्व कल्याण प्रार्थना’ प्रदान करण्यात आली. राज्यभरातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
विचारमंथन सत्रात पत्रकारितेच्या मूल्यांवर भर: द्वितीय सत्रात ‘पत्रकारांचा डीएनए काय?’, ‘सायबर युगातील माध्यमे व मूल्यनिष्ठ पत्रकारिता’ या विषयांवर चर्चासत्र झाले. ज्येष्ठ संपादक डॉ. राजेश राजोरे यांनी सत्य, संयम व समाजहित हाच पत्रकाराचा खरा डीएनए असल्याचे प्रतिपादन केले. सामाजिक माध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबाबत पत्रकारांनी सजग राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पत्रकारांसाठी ‘लाडका पत्रकार योजना’ सुरू करण्याची मागणी मांडली.
१५ ठरावांना एकमुखी मंजुरी: अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने १५ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. ठरावांचे वाचन डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले. उपस्थित सर्व प्रतिनिधींनी एकमुखाने ठरावांना मंजुरी दिली.
कार्यक्रमात संत सावता माळी क्रीडा मंडळाच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर केले. वारकरी दिंडी, लेझीम पथक व विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी सोहळ्याला रंगत आणली.
राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना आकर्षक बॅग, डायरी, पेन व दिनदर्शिका भेट देण्यात आली. वाशिम येथे अनेक वर्षांनंतर राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनाचे यशस्वी आयोजन झाल्याने जिल्ह्याच्या नावाची राज्यभरात चर्चा होत आहे.